मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मावळत्या दिनकरा

मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करा | जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवि मावळत्या, रीत जगाची ही रे सवित्या स्वार्थपरायणपरा | उपकाराची कुणा आठवण ? ‘शिते तोवरी भूते’ अशी म्हण; जगात भरले तोंडपूजेपण, धरी पाठिवर शरा | आसक्त परि तू केलीस वणवण, दिलेस जीवन, हे नारायण, मनी न धरिले सानथोरपण, समदर्शी तू खरा | प्रभु-सचिवा विरही मुखधूसर होति दयामृदु नयनिष्ठुर कर टाकुनि कारभार चंद्रावर चाललास तू खरा | कवी - भा.रा.तांबे

मधुघट

मधु मागशि माझ्या सख्या परी, मधुघटचि रिकामे पड़ती घरी आजवरी कमळाच्या द्रोणी मधु पजीला तुला भरोनि, सेवा हि पुर्वीची स्मरोनी, करी रोष न सखया, दया करी नैवेद्याची एकच वाटी अतां दुधाचि माझ्या गाठी, देवपुजेस्तव ही कोरांटी बाळगी अंगणी कशि तरी तरुण-तरुणीची सलज्ज कुजबुज वृक्ष-झर्यांचे गुढ मधुर गुज, संसाराचे मर्म हवे तुज, मधु पिळण्या परी रे बळ न करी ढळला रे ढळला दिन सखया संध्याछाया भिवविती हृदया, अतां मधुचे नांव कासया? लागले नेत्र रे पैलतीरी कवी - भा. रा. तांबे

झाशीची राणी

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली ll ध्रृ ll तांबेकुलवीरश्री ती, नेवाळकरांची कीर्ति, हिंदभूध्वजा जणु जळती, मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ll १ ll घोडयावर खंद्या स्वार, हातात नंगि तलवार, खणखणा करित ती वार, गोर्‍यांची कोंडी फोडीत, पाडीत वीर इथे आली ll २ ll कडकडा कडाडे बिजली, शत्रुंची लष्करे थिजली, मग कीर्तिरूप ती उरली, ती हिंदभूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली ll ३ ll मिळतील इथे शाहीर, लववितील माना वीर, तरु, झरे ढाळीतील नीर, ह्या दगडां फुटतील जिभा कथाया कथा सकळ काळी! ll ४ ll  कवी -  भा. रा. तांबे

रुद्रास आवाहन

डुमडुमत डमरू ये, खणखणत शूल ये,  शंख फुंकत ये, येई रुद्रा! प्रलयघनभैरवा, करीत कर्कश खा  क्रूर विक्राळ घे क्रुध्द मुद्रा ! कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षिका,  खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका,  मांड वादळ, उधळ गिरी जशी मृत्तिका  खवळवीं चहुंकडे या समुद्रां !  पाड सिंहासने दुष्ट हीं पालथीं,  ओढ हत्तीवरुनी मत्त नृप खालती,  मुकुट रंकास दे, करटी भूपाप्रती, झाड खटखट तुझें खड़ग क्षुद्रां !  जळ तडागं सडे, बुडबुडे, तडतडे "शांति ही!" बापुडे बडबडति जन-कीडे ! धडधडा फोड तट! रुद्र ये चहुंकडे, धगधगित अग्निमंधि उजळ भद्रा !  पूर्वी नरसिंह तूं प्रगटुनी फाडिले  दुष्ट जयीं अन्य गृहीं दरवडे पाडिले, बनुनि नृप, तापुनी चंड, जन नाडिले दे जयांचें तयां वीरभद्रा!  कवी - भा. रा. तांबे

मातृभूमीप्रत

जन्मा येउनिया कुशीं तव; तुझ्या स्कंधीं उरीं वाढुनी प्रेमाचा नच गोड शब्द वदलों केव्हां तुला आजुनी, नाहीं एक विचारही अजुनिया त्वत्सेवनीं योजिला; ऐशाला म्हणशील काय मजला तूं सांग गे आपुला ?  || १|| जे त्वत्पुत्र उदारधी झिजविती काया तुझ्या सेवनीं, जाळाया निज पोट ही शिणविली वाणी तयां निंदुनी; व्हावा तोष धन्यास यास्तव सदा मी हासलों त्यांजला, आतां तूं कुरवाळशील वद का ऐशा कुपुत्रा मला ?  ||२|| 'खोटी ही दुबळी, गुलाम, भरला वृद्धापकाळीं चळ,' ऐसा दोष दिला तुला वश परां होवोनिया केवळ; आतां हें स्मरतां मना हळहळे तें; गे गळा दाटला- डोळे तूं पुसशील काय पदरें घेवोनि अंकीं मला ?  ||३|| जें त्वां जीवन हें दिलें, सकळ ही सत्ता तुझी ज्यावरी जातां तें परसेवनीं न तिळही संकोचलों अंतरीं; धिग्धिग् जीवन हें ! असें मन अतां धिक्कारितें गे मला, त्यातें तूं धरिशील काय ह्रदयीं पान्हा फुटोनी तुला ? || ४|| आहाहा ! सुत ते असिव्रत जईं त्वत्सेवनीं पाळितां धैर्याचे गिरि ते कधीं न डगले आकाशही फाटतां, नेतां त्यांस दिगंतरास फुटला आई, उमाळा तुला- डोळे तूं पुसशील का निज, यमें नर्कास नेतां मला ?  ||५|| कवी - भा. रा. तांबे

वायो, खुणव तीस

येतां तुझ्या दारिं मी वाट चालोनि चालें पुढे, येथ थांबोनि थांबोनि. ।।ध्रु०।। असशील तूं आंत घरकामधंद्यांत, रेंगाळी कुणि दारिं, तुज भान कोठोनि ।।१।। छुमछुम तुझे पाय स्रवतात नव राग, कुणि भाग्यवंतास सुख आंत ऐकोनि ।।२।। डोळे तुझे जेथ पडति घरामाजि सौभाग्य अरुणास त्या ठायिं नाचोनि ।।३।। मी मात्र या दारिं घोटाळिं आशाळ, कीं ढुंकशिल काय येथोनि तेथोनि ।।४।। चाले असें येथ हें रोजच्या रोज, सांगेल तुज कोण दारीं उभे कोणि ।।५।। मी टाकितों येथ काळीज हें फूल; वायो ! खुणव तीस, ने वास वाहोनि ।।६।। कवी - भा. रा. तांबे

पत्र

पत्रे तिला प्रणयात आम्ही खुप होती धाडली, धाडली अशी होती की नसतील कोणी धाडली धाडली मजला तिने ही, काय मी सांगु तीचे सर्व ती माझीच होती, एकही नव्हते तीचे पत्रात त्या जेव्हां तिचे ही पत्र हाती लागले वाटले जैसे कोणाचे गाल हाती लागले पत्रात त्या हाय ! तेथे काय ती लिहीते बघा माकडा आरशात आपुला चेहरा थोडा बघा सार्तथा संबोधनाची आजही कळली मला व्यर्थता या य़ौवनाची तिही आता कळाली मला नाही तरीही धीर आम्ही सोडीला काही कुठे ऐसे नव्हे की माकडाला, माकडी नसते कुठे कवी - भाऊसाहेब पाटणकर

नाजूकता

नाजूकता ऐसी कुणी पाहिली नाही कधी नजरही आम्ही तिच्यावर टाकली नाही कधी भय आम्हा नाजूकतेचे हेच होते वाटले भारही नजरेतला या सोसेल नव्हते वाटले टाकसी हळुवार अपुली नाजूक ईतुकी पाऊले टपकती हलकेच जैसी परिजाताची फ़ुले नाजूकता जाणून आम्ही आधीच होती बिछवली पायातळी केव्हाच तुझिया विकल ह्रुदये आपुली इतुका तरी हा स्पर्श ह्रुदया होईल होते वाटले इतुके तरी सद्भाग्य उदया येईल होते वाटले कल्पना नाजूकतेची आम्हासही नव्हती कधी गेली आम्हा तुडवून आम्हा कळलेच ना गेली कधी कवी/शायर - भाऊसाहेब पाटणकर

कीर्ति

एकदा मेल्यावरी मी परतुनी आलो घरी तेच होते दार आणि तीच होती ओसरी होती तिथे तसबीर माझी भिंतीवरी टांगली खूप होती धूळ आणि कसर होती लागली द्रवलो तिला पाहून, होती शेवटी माझीच ती दिसली मला पण आज माझ्या प्रेताहुनी निस्तेज ती बोलली की हीच का, माझ्यावरी माया तुझी गेलास ना टाकून, होती प्रत्यक्ष जी छाया तुझी बोलली हे ही तुला का सांगावया लागते मेल्यावरी जगण्यास वेड्या, खूप कीर्ति लागते होऊनी स्वार्थांध नुसता, कैसातरी जगलास तू आहेस का, केला कुठे, जगण्याविना पुरुषार्थ तू? समजली ना, आता तरी, आपुली स्वत:ची पायरी समजले ना काय मिळते, नुसती करूनी शायरी? ओशाळलो ऐकून, नेली तसबीर मी ती उचलुनी सांगतो ह्याची तिथे, चर्चाही ना केली कुणी कवी - भाऊसाहेब पाटणकर

जयहिंद आणि जयजवान

ऐसे नव्हे की भारती या बुद्ध नुसता जन्मला, नुसताच नाही बुद्ध येथे आहे शिवाजी जन्मला विरतेची भारती या ना कमी झाली कधी, आमचा इतिहास नुसता इतिहास ना झाला कधी तीच आहे हौस आम्हा व्हावया समरी शहीद, बाजी प्रभूही आज आहे आज तो अब्दुल हमीद बोलला इतुकेच अंती आगे बढो आगे बढो, देउन गेला मंत्र जसा आगे बढो आगे बढो धर्माहुनी श्रेष्ठ आपल्या देशास जो या समजला, मानु आम्ही त्यालाच आहे धर्म काही समजला जन्मला जो जो इथे तो वीर आहे जन्मला, अध्यात्म ही या भारताच्या युद्धात आहे जन्मला कुठला अरे हा पाक याचे नावही नव्हते कुठे, कळणारही नाही म्हणावे होता कुठे गेला कुठे हे म्हणे लढणार यांच्या दाढ्या मिश्या नुसत्या बघा, पाहिली नसतील जर का बुजगावणी यांना बघा पाहण्याला सैन्य त्यांचे जेव्हा आम्ही गेलो तिथे, नव्हते कोणीच होते फ़क्त पैजामे तिथे आहे ध्वजा नक्कीच आमुची पिंडीवरी लहरायची, फ़क्त आहे देर त्यांनी समरी पुन्हा उतरायची हाच आहे ध्यास आता अन्य ना बोलू आम्ही, बोलु आम्ही जयहिंद आणि जयजवान बोलू आम्ही कवी - भाऊसाहेब पाटणकर

हसतील ना कुसूमे जरी...

हसतील ना कुसूमे जरी, ना जरी म्हणतील 'ये' पाऊल ना टाकू तिथे, बाग ती अमुची नव्हे भ्रमरा परी सौंदर्यवेडे आहो जरी ऐसे अम्ही इश्कातही नाही हुठे भिक्षुकी केली अम्ही खेळलो इश्कात आम्ही बेधुंद आम्ही खेळलो लोळलो मस्तीत नाही पायी कूणाच्या लोळलो अस्मिता इश्कात सा-या केव्हांच नाही विसरलो आली तशीही वेळ तेव्हा इश्क सारा विसरलो रडलो आम्ही इश्कात जेव्हा आम्हा रडावे वाटले तेव्हा नव्हे इश्कास जेव्हा आम्ही रडावे वाटले आसूवरी अधिकार हाही इश्कात ज्याला साधला नुसताच नाही इश्क त्याला मो़क्ष आहे साधला बर्बादिची दीक्षा जशी इश्कात आम्ही घेतली इश्कही बर्बाद करण्या माघार नाही घेतली ना रडू नुसतेच आम्ही हाय ना नुसते करु आहो शिवाचे भक्त आम्ही हेही करु तेही करु कवी - भाऊसाहेब पाटणकर

स्वप्न

भीती तिला प्रणयात कोणी पाहील याची वाटते येवूनही स्वप्नी माझ्या हेच तिजला वाटते म्हणते कशी कैसी तरी स्वप्नात ह्या आले तुझ्या सारेच पण आहेत बाई भोवती जागे तुझ्या जाणते सर्वांस यांना मी ही नव्हते साधी तशी स्वप्नातही येतील मेले मी जशी आले तशी भेटण्या जेव्हा तिच्या स्वप्नात मी गेलो तिथे स्वप्नातही अपुल्या स्वत:च्या हाय ती नव्हती तिथे त्रास ऐशा अप्सरेला हाच असतो सारखा नेतो तिला उचलून जो तो आपुल्याच स्वप्नी सारखा ऐकिले दुसर्‍या कुणाच्या स्वप्नात ती आहे तिथे बोलाविले नव्हते तरीही धावुनी गेलो तिथे आता तरी दुर्दैव वाटे नकीच माझे संपले पोचण्या आधीच ते ही स्वप्न सारे संपले

पत्ते

मारतो राजास एक्का, नहिल्यास दहीला मारतो कल्पनेचे खेळ सारे, कोणी कुणा ना मारतो पाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे सारेच तुकडे कागदाचे, छाप नुसते वेगळे आता जरासा रंग काही खेळास येऊ लागला पत्यातला राजा स्वतःला राजाच मानू लागला राणीसही जाणिव काही और होऊ लागली लाजलि नव्हती कधी ती आज लाजू लागली दिनतेचा खेद आता दुर्रीस होऊ लागला पंजा म्हणे चौर्र्यास आता श्रीमंत वाटु लागला विसरून निजरुप नुसत्या नामरुपी गुंतले भलत्याच कुठल्या अवदसेच्या पाषात आता गुंतले नुसता उपाधी भेद कोणी राजा नव्हे राणी नव्हे आणखी सांगु पुढे तो खेळही अमुचा नव्हे खेळतो दुसराच, त्याला पाहिले नाही कुणी म्हणती तयाला इश,म्हणति अल्ला कुणी, येशू कुणी त्याचा म्हणे हा खेळ, नुसते पत्ते आम्ही पत्यातले एका परि पत्त्यास कळले मर्म हे पत्यातले आहे इथे रंगेल कोणी पत्ता असा पत्यातला आहे जरी पत्यातला तो नाही तसा पत्यातला नामरूपाचा सतःच्या पत्ताच ना त्याला कधी ना कशाची खंत होतो राजा कधी, दुर्री कधी हासतो नुसताच आहे सर्वाहुनी हा वेगळा आणखी सांगाल काहो वेदांत कोणी वेगळा कवी/शायर - भाऊसाहेब पाटणकर

सिद्धांत आसवांचा

आरंभही मी जीवनाचा, रडण्यातुनी केला सुरू अंतावरी रहील वाटे, कार्य हे माझे सुरू आता जसा निःशंक रडण्या, सरसावलो थोडा पुढे आले स्वये भगवान, आणि टाकली गीता पुढे याही जरी जन्मात आम्हा देइल ना कोणी रडू मी तरी सांगा अता कोठे रडू, केव्हा रडू बोललो रडलास तूही, हरवता सीता तुझी रडता अम्ही आम्हापुढे, टाकसी गीता तुझी? ओशाळला ऐकून आली, सारी स्मृती त्याला पुन्हा भगवानही मी काय सांगू, माझ्या पुढे रडला पुन्हा आसवे आम्हीच पुसली, नयनातली आम्ही स्वये प्रार्थुनी म्हणतो कसा, सांगू नको कोणास हे बोललो कि व्यर्थ आहे, परमेश्वरा शंका तुझी राखायची आहे मलाही, परमेश्वरा अब्रू तुझी रडण्यातही सौंदर्य माझ्या, ना जरी बघते कुणी भगवन अरे, ही शायरीही ऐकली नसती कुणी सिद्धांत ऐसा आसवांचा, त्यालाच मी सांगितला होता जसा युद्धात त्याने, कुंतीसुता सांगितला बोलला, साक्षात अविध्यानाथ आम्ही पहिला पार्थाहुनीही मूर्ख आम्ही, अद्याप नव्हता पाहिला. कवी/शायर - भाऊसाहेब पाटणकर

मृत्यू

जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये होती आम्हा जाणीव की, मी मेलो, आता बोलू नये कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले ऐसे जरी संतोष तेव्हा मानीला इतुकाच मी कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली। कवी/शायर - भाऊसाहेब पाटणकर

निष्काम कर्म

सांगशी निष्काम कर्म, कृष्णा अरे वेदांत तू समजला की काय आम्हा किर्लोस्करांचा पंप तू मोक्ष हा परमार्थ ऐसे सांगशी जेथे तिथे तू तरी देवा कधी आहेस का गेला तिथे? भोगीशी ऐश्वर्य, सारे वंदिति एच्छा तुझी सन्यास पण सार्‍या जगाने, घ्यावा अशी एच्छा तुझी निष्कामता अंगी, थोडी जरी असती तुझ्या धावूनी सार्‍या येता, आमच्याकडे गोपी तुझ्या अरे भगवंता भेटुनीया, मज काय देशील तू? मंत्र्या परी येशील, थोडा हासूनी जाशील तु प्रारब्ध जर अमुचे, आम्हा आहे भोगायचे सांग तर आम्ही कशाला,कुंकू तुझे लावायचे कवी - भाऊसाहेब पाटणकर

अस्थाई

अस्थाईवर स्थायिक झालों, चुकून गेला पहा अंतरा ओरडून का अता लागणे ढिल्या गळ्यावर पंचम गहिरा! नशेत झुकला निशापती अन् अस्मानाच्या कलल्या तारा; अंधारावर विझून गेला रात्रीचा या वीज-पिसारा क्लिन्न मनोगत मोटारींचें कुशींत शिरले काळोखाच्या; नालबंद अन् घोड्याची ये टाप समेवर जिवंततेच्या. शांत जगाच्या घामावरला उडून काळा गेला वास; बेटाबेटांतुनी मनांच्या जराच हलला श्वासोच्छ्वास. अस्थाईवर पुन्हा परतलों, चुकून गेला पहा अंतरा; ढिल्या गळ्यावर षड्ज बांधणें अता खालचा परंतु हसरा. कवी - बा.सी.मर्ढेकर